पंढरपूर : माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी अर्थातच शेतीच्या शाश्वततेला महत्त्व आहे. विविध कारणांमुळे आज मातीची सुपीकता घटत चालली असून, अनेक ठिकाणी वाळवंटीकरण होऊ लागले आहे. हा चिंतेचा विषय बनला असताना सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी मुरूम व गाळमातीचा वापर करून जमीन सुपीक बनवली आहे. वाळवंटीकरणाबद्दलची जागरूकता वाढीला लागण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघातर्फे १७ जून रोजी
‘दुष्काळ आणि वाळवंटीकरण लढा दिन’ पाळला जातो. त्या पार्श्वभूमीवर, सोलापूर जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या प्रयोगांचा आमच्या प्रतिनिधीने आढावा घेतला.
उजनी धरणाच्या कार्यक्षेत्रातील रोपळे बुद्रुक (ता. पंढरपूर) गावातील शेतकरी उसाची शेती करतात. रासायनिक खते व पाण्याचा बेसुमार वापर केल्यामुळे तेथील जमिनी नापीक बनू लागल्या होत्या. साधारण २०११-१२पर्यंत शेतकऱ्यांचे उसाचे उत्पादन एकरी केवळ २५ ते ३० टनांवर आले होते. आतबट्ट्याची शेती करणे शेतकऱ्यांना परवडणारे नव्हते.
दरम्यानच्या काळात मोठा दुष्काळ पडला होता. त्यामुळे बहुतांश शेती पडीकच होती. अशा परिस्थितीत काही शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जवळच्याच आष्टी तलावातील गाळमाती भरून घेतली, तर काही शेतकऱ्यांनी शिवार मुरूमाने भरून घेतले. त्यामुळे जमीन सुपीक बनण्यासाठी खूपच फायदा झाला. जमिनीचा पोत सुधारल्यामुळे उसाच्या उत्पादनात भरघोस वाढ झाली. शेतात मुरूम व गाळमातीचा वापर, पाण्यासाठी ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब, पाचट जाळणे बंद करणे, आदींमुळे येथील शेती सुपीक बनली. उसाच्या शेतीचे वाळवंट होता-होता वाचल्यामुळे शेतकऱ्यांकडे आता चार पैसे शिल्लक राहू लागले आहेत.
पंढरपूर-बार्शी रस्त्यावर डॉ. महावीर शहा यांची शेती आहे. त्यांच्या शेतातील जमीन चोपण बनल्यामुळे ऊस गोड लागण्याऐवजी खारट लागत होता. उसाचे उत्पादनही कमालीचे घटले होते. अशा परिस्थितीत त्यांनी चोपण जमिनीत बारीक मुरूम घातला. गोमूत्र, गोमय, बेसन, तंबाखू व वडाच्या झाडाखालच्या मातीच्या स्लरीचा वापर केला. पाचट शेतातच कुजवले. त्यामुळे त्यांची शेती सुपीक बनली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे त्यांचा खारट ऊस आता गोड बनला आहे. एकरी उत्पादन ९० टनांच्या वर गेले आहे. यंदा एकरी १०० टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
‘शेतात मुरूम भरण्यासाठी आमचा खर्च मोठा झाला असला, तरी शेती हाताला लागल्याचे फार मोठे समाधान आहे,’ असे डॉ. महावीर शहा यांनी सांगितले. खडकाळ शेतात तलावातील गाळ भरून घेतल्यामुळे पाण्याच्या बचतीबरोबरच शेती सुपीक होण्यास चांगला फायदा झाल्याचे आणखी एका शेतकऱ्याने सांगितले.
(जगभरातील विविध ठिकाणी वाळवंटीकरण रोखण्यासाठी केलेल्या काही उल्लेखनीय प्रयोगांचे, तसेच अन्य संबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी
येथे क्लिक करा.)